बुलबुली ते धान खेयेचे, खाजना देबो किशे””””
- lokpatra2016
- Jul 14, 2020
- 2 min read
”

बंगाल आणि आजूबाजुच्या प्रदेशात आजसुद्धा लहान मुलांसाठी ही कविता गायली जाते. ऱ्हाईम्स का काय ते तेच. पण ही कविता मराठ्यांशी निगडित आहे हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
बघुयात तर काय आहे नेमकी गोष्ट.
एप्रिल १७४० मध्ये, सरफराज खानाची हत्या करून बंगालच्या सुभ्यावर (आताचे बिहार, ओरिसा आणि पश्चिम बंगाल) अलावर्दी खान याने आपली सत्ता स्थापन केली. या विरुद्ध सरफराज खानाचा मेहुणा रुस्तमजंग याने बंड पुकारले. रुस्तमजंग हा ओरिसा सुभ्याचा प्रमुख तर बंगाल प्रांताचा नायब नवाब होत. अलवर्दी खानाने त्याचा पराभव करून ओरिसा प्रांत आपल्या भाच्याला दिला. रुस्तमजंग मदतीसाठी नागपूरकर राघोजी भोसल्यांच्या कडे आला आणि नागपूरकर भोसल्यांच्या मदतीने त्याने ओरिसा प्रांत पुन्हा हस्तगत केला. हा होता मराठ्यांचा बंगला प्रांतात पहिला प्रवेश.
या नंतर मात्र मराठ्यांनी नवाबाच्या प्रदेशात सतत धुमाकूळ घालणं चालू केलं. पुढील जवळपास १० वर्षे (१७४१ ते १७५१) मराठ्यांनी बंगाल सुभ्यावर आक्रमण करून चौथाई वसूल केली. मराठ्यांची ही आक्रमणे इतकी मोठी असत की लहान मुलांना भीती घालण्यासाठी त्यांच्या आया भास्कर पंडित या मराठा सरदारांची भीती घालत असत. अगदी आजही ही भीती घातली जाते.
“”खोका घुमालो, परा जुरालो बोर्गी इलो देशे””
“”बुलबुली ते धान खेयेचे, खाजना देबो किशे””””
ही कविता तर मराठ्यांच्या आक्रमनावरच केलेली आहे, या कवितेचा साधारण अर्थ
“”जेऊन खाऊन मुलं झोपली की बार्गी(बारगिर) गावात येतात.
बुलबुल सगळं धान्य खाऊन गेलं आता यांना कर कुठून देऊ अस होतो.””
शेवटी मे १७५१ मध्ये मराठे आणि बंगालचा नवाब यांच्यात तह झाला, तहानुसार मीर हबीब हा बंगालचा वजीर नेमला गेला, तर नवाबाने मराठ्यांना वार्षिक 12 लाखांची चौथाई देण्याचे मंजूर केले. सोबतच मागील शिल्लक 32 लाखांची चौथाई मराठ्यांना देऊ केली. या तहानुसार नवाब फक्त नावापुरताच उरला आणि हा भाग ही मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला.
नवाबकडून ही चौथाई मराठ्यांना १७५७ साला पर्यंत मिळत होती. या नंतर बंगाल प्रांत ईस्ट इंडिया कंपनी च्या अमलाखाली गेला. पण मराठा आक्रमणाची धास्ती आणि भीती आजही या कवितेच्या माध्यमातून इथल्या गावागावात आहे
बारगिर : मराठा घोडदळातीळ शिपाई ज्यांना सरकारातून घोडा दिला जाई.
महेश तानाजी देसाई
मुंबई
9137132689
Comments