top of page
Search

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडक कायद्याची आठवण

  • Writer: lokpatra2016
    lokpatra2016
  • Jun 30, 2020
  • 3 min read

स्त्रियांवरच्या अत्याचाराची एखादी घटना आजूबाजूला घडली की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडक कायद्याची आठवण सर्वांनाचदी अश्याच कठोर कायद्याची देशाला गरज असल्याचे बोलले जात. जाणून घेऊयात मग शिवकालीन पत्रामधून काय होती होते. आपल्या गावातील स्त्री बरोबर बदअमल करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचा शिवरायांनी चौरंगा केला. अगही घटना आणि त्याचा नेमका काय परिणाम झाला.

दिनांक २८ जानेवारी १६४६ (काही ठिकाणी १८ जानेवारी) रोजी खेडेबाऱ्याच्या देशकुलकर्णी याना लिहिलेल्या पत्रातुन हा सगळा प्रकार आपल्या समोर येतो. पत्रात सांगितल्या प्रमाणे मौजे रांझे गावचा मोकदम(पाटील) बाबाजी बिन भिकाजी गुजर याने बदअंमल केला. हे महाराजांना कळल्यावर त्याला महाराजांसमोर हजर केलं गेलं. आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याची मोकदमी(पाटीलकी) जप्त केली. आणि “त्याचे हातपाय मारून दूर केला”. म्हणजेच चौरंगा केला गेला. बदअमल केला या शब्द व्याख्येवरून बऱ्याच वेळा तो व्यभिचार की बलात्कार असा प्रश्न उपस्थित होतो.पण शेवटी तोही गुन्हाच या न्यायाने या वादात न पडलेलं बर. गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा आणि चांगल्या कामाला तात्काळ बक्षीस या तत्वामुळेच शिवराय सहकाऱ्यांवर एकाचवेळी दबाव आणि आपुलकीच नात निर्माण करू शकले.बाबाजी बिन भिकाजी गुजर याची तक्रार आल्यावर तात्काळ चौकशी केली गेली आणि गुन्हा शाबूत झाल्यावर तात्काळ शिक्षा अमलात आणली गेली. Justice delayed is justice denied” अस म्हणलं जात. पण शिवरायांच्या काळात गुन्हेगारास तात्काळ शिक्षा आणि त्यावर तात्काळ अंमलबजावणी हे सूत्र वापरले आहे.बरं हे इथच थांबलेल नाही, बाबाजी बिन भिकाजी गुजर याचा चौरंगा जरी केलेला असला तरीही त्यानंतर तो जिवंत आहे. आता बाबाजी बिन भिकाजी गुजर याला वारस न्हवता त्यामुळं त्याचा एक नातलग सोनजी बिन बनाजी गुजर राहणार किल्ले पुरंदर, याने त्याला आपल्या ताब्यात घेतलं आहे. ते ही सरकारात ३०० पादशाही होणाचा भरून. पण आता बाबाजी बिन भिकाजी ह्याचा सांभाळ तर आपल्याला करायला लागणार पण आपली तेवढी ताकद नाही त्यामुळं बाबाजी बिन भिकाजी गुजर याची जी पाटीलकी सरकारने जप्त केलीय ती मला द्यावी अस अर्ज या सोनजी बिन बनाजी गुजर याने महाराजांना केला. आणि मग त्याला ती पाटीलकी म्हणजे रांझे गावची मोकदमी देण्यात आली. बरं ती अशीच नाही दिलीय त्यासाठी वेगळे २०० पादशाही होणं सेरणी म्हणून सरकारात जमा करायला लावले आहेत.

मूळ मोडी पत्राचा देवनागरी अनुवाद खालील प्रमाणे :

शिवरायांची राजमुद्रा

अजरख्तखाने राजश्री शिवाजी राजे दामदौलत हु बजानीब कारकुणानी व देशकुलकर्णीयांनी तर्फ खेडेबारे बिदानद सुरू सन सित आर्बेन अलफ बावाजी बिन भिकाजी गुजर मोकदम मौजे रांजे तर्फे मजकूर हा मौजे मजकुराची मोकदमी करीत असता याजपासून कांहीं बदअमल जाला हे हकीकत हुजूर साहेबांपाशी विदित जाली त्यावरून बेहुकमी तलब करून साहेबी हुजूर आणून वाजपुस करिता खरे जाले याजकरिता बावाजी मजकूर याची वतनी मोकदमी हुजूर अनामत केली बावाजीचे हातपाय तोडुन दूर केला ते वक्ती सोनजी बिन बनाजी गुजर किल्ले पुरंदर हे जनांत गोत म्हणून येऊन अर्ज केला जे आपले हाती देणे बराय अर्ज खातरेस आणून बावाजी मजकूर याचे माथा गुन्हेगारी होण पादशाही तीनशे करार केले ते सोनजी मजकूर याने देऊन बावाजीस हाती घेतले याचे पोटी संतान नाही हे कुळीचे गुजर म्हणोन साहेब मेहेरबान होऊन मौजे रांजे तर्फे मजकुरची मोकदमी सोनजी बीन बनाजी गुजर याचे दुमलाकरून याजपासोन दिवाण सेरणी होणं पादशाही दोनशे करार करून घेऊन मोकदमी यास दिधली असे यास कोणी मुजाहिम न होणे असल पत्र फिराऊन भोगवटीस देणे उजूर न करण मोर्तब सूद

या घटनेचा नेमका काय परिणाम झाला हे दाखवणारी घटना १६५२ साली घडली.

कायदा कडक असला की जनमानसांत त्याची भिड राहून लोक पुन्हा तो गुन्हा करावयास धजत नाहीत. रांझ्याच्या पाटलाला जानेवारी १६४६ साली शिक्षा करण्यात आली.त्यानंतर मात्र शिवकाळात अशी फारशी उदाहरणे पुन्हा सापडत नाहीत. ११ डिसेंम्बर १६५२ रोजी मोसे खोऱ्यातील आपल्या मुलकी अधिकाऱ्यांना लिहिल्या एका पत्रातून मात्र असा एक प्रकार आपल्या लक्षात येतो.

मोसे खोऱ्यातील तपे मजकुरीच्या सात गावचा मुलकी कारभार रंगोबा त्र्यंबक वाकडा हा कुलकर्णी बघत होत. ह्याचवेळी गावातील विधवा ब्राह्मण स्त्री सोबत त्याने सिंदलकीचा गुन्हा केला. याबाबत गावातील लोकांना माहिती झाली आणि हिं खबर महाराजांपर्यंत गेली.

महाराजांनी त्या रंगोबा ला पकडून आणायचे आदेश दिलेलं होते. मात्र आपली तक्रार महाराजांकडे गेलीय, आता शिवाजी महाराजांचे लोक येणार आपल्याला पकडून नेणार या भीतीने आपलं वतन सोडून हा कुलकर्णी गावातून पसार झाला. आणि थेट जावळीच्या मोर्यांच्या आश्रयाला गेला. पण छत्रपती शिवरायांच्या न्यायव्यवस्थेची खात्री आणि शिक्षेबद्धलची ही भीती इतकी प्रचंड होती की, रंगो त्रिमल वाकडा घाबरूनच जावळी मुक्कामी मयत झाला. ११ डिसेंम्बर, १६५२ रोजी लिहिलेले हे पत्र, मोसे खोऱ्यातील सरदेशमुख, कारकून, देशमुख, देशकुलकर्णी, मोकदम, खोत, मिरासदार याबसर्वांना उद्देशून आहे. या पत्रांनुसार, सिंदलकीचा गुन्हा करून पळून गेलेल्या आणि नंतर मयत झालेल्या रंगोबा त्रिमल वाकडा याची ६ गावची कुलकर्णी रिकामी झालेली आहे. या रंगोबा ला अपत्य नाहीय, आणि त्याचे भाऊबंद सुद्धा दुष्काळात आधीच मेलेले आहेत, त्यामुळं या सहा गावची आणि मौजे तोव या अजून एका कुलकर्णी नसलेल्या गावची अशी एकूण सात गावची कुलकर्णी सरकारातुन अमराजी नीलकंठ करंजकर याना दिले आहेत. यासाठी ५० होण शेरणी घेऊन त्यांना तसा पत्र (खुर्दखत) दिलेले आहे. त्यानुसार सात गावची मिराशी(वंशपरंपरागत हक्क) दिलेले आहेत यावर अंमलबजावणी करणे यासाठी पुन्हा नवीन खुर्दखताचा आग्रह न धरता, पुढील नूतनीकरण करणे. असा एकूण संदर्भ या पत्रातून स्पष्ट होतो. एखाद्या गावचा मुलकी अधिकारी पद रिक्त झाल्यास त्यावर तात्काळ दुसरा अधिकारी नेमून कार्यालयीन कामात कोणताही खंड पडू नये याची काळजी महाराज वारंवार घेत होते हे यामधून महाराजांचीनप्रशासनावरील पकड सुद्धा दिसून येते. सोबतच रांझ्याच्या पाटलांला केलेल्या शिक्षेमुळ लोकांत कोणत्या प्रकारचा धाक निर्माण झाला होता हें सुद्धा इथं यातून स्पष्ट होत.

संकलक : महेश तानाजी देसाई

मुंबई

9137132689

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9623695024

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by mh 20 lokpatra. Proudly created with Wix.com

bottom of page